पालघर : राज्य सरकारने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाचा फायदा पालघर जिल्ह्याच्या आठ तालुक्यांतील १५ हजार ६६६ कर्जबाजारी शेतकऱ्यांना मिळणार आहे. या शेतकऱ्यांची तब्बल १०३ कोटी ६५ लाख रुपयांची कर्जे माफ होणार आहेत. सरकारच्या या निर्णयाचे येथील शेतकऱ्यांनी स्वागत केले असून, शेतकरी नेत्यांनाही धन्यवाद दिले आहेत.
पालघर जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी खरीप किंवा रब्बी कर्ज घेण्यासाठी जिल्हा बँकेचा पर्याय निवडतात. त्यामुळे हे कर्जवाटप इतर बँकांच्या तुलनेत ठाणे जिल्हा सहकारी बँकेमार्फत विविध सेवा सहकारी संस्थांकडून मोठ्या प्रमाणात वितरित केले जाते.
ठाणे जिल्हा बँकेला या कर्जासाठीचा लक्ष्यांकही मोठा आहे. गेल्या वर्षी ठाणे जिल्हा बँकेकडून वितरीत केलेल्या पालघर जिल्ह्यातील १५ हजार ६६६ शेतकऱ्यांना १०३ कोटी ६५ लाख रुपयांचे कर्ज दिले आहे. यामध्ये ५० हजार ते एक लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या ३७५४ अल्प-भूधारक शेतकर्यांना सुमारे २४ कोटी ६१ लाख रुपये, तर ६६५३ अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना सुमारे ४३ कोटी ७३ लाख रुपये व दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेल्या ५२५९ शेतकऱ्यांना सुमारे ३५ कोटी ३१ लाख रुपये असे सर्व मिळून १५ हजार ६६६ शेतकऱ्यांना १०३ कोटी ६५ लाख रुपये कर्जमाफी मिळणार आहे.
‘शेतीकर्जाची थकबाकी नेहमीच जास्त राहत असल्याने जिल्हा बँकेचा ताळेबंद अशक्त होता. परंतु राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा एक चांगला निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांची कर्जे तर कमी होतीलच, परंतु जिल्हा बँकेचे ताळेबंद सशक्त होणार आहेत,’ अशी प्रतिक्रिया ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगीरथ भोईर यांनी व्यक्त केली आहे.
‘शेतकऱ्यांची कर्जमाफी हा शासनाने घेतलेला स्तुत्य निर्णय आहे,’ अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी व्यक्त केली.
‘हा शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आणि त्यांचा विजय आहे,’ अशी प्रतिक्रिया कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी व्यक्त केली.